आस्वला–मेंढा तलाव बांधकाम साहित्य चोरीचा मोठा भंडाफोड, माजी ग्रामपंचायत सदस्यासह चार जण अटकेत
चंद्रपुर महाराष्ट्र
रिपोर्टर:- सचिन ढगें रिड पब्लिक न्यूज़ भारत
दिनांक:- ०५ फरवरी २०२६
सविस्तर बातमी:-चंद्रपुर सावली तालुक्यातील गोसिखुर्ध–आस्वला–मेंढा परिसरात सुरू असलेल्या तलाव बांधकामाच्या नावाखाली झालेल्या कोट्यवधींच्या घोटाळ्याचा अखेर पर्दाफाश झाला आहे. 31 जानेवारी 2026 रोजी रात्रीच्या सुमारास दोन ट्रॅक्टरभर सळई व लोखंडी रॉड लंपास करण्यात आले होते. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. मात्र बराच काळ आरोपी मोकाट फिरत होते, त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.
अखेर 4 फेब्रुवारी 2026 रोजी पोलिसांनी मोठी कारवाई करत या प्रकरणातील चार आरोपींना बेड्या ठोकल्या. अटक करण्यात आलेल्यांमध्ये माजी ग्रामपंचायत सदस्य रामू पाटील ठिकरे, अमित रामू ठिकरे, जगदीश रामू ठिकरे आणि गौरव वाणी यांचा समावेश आहे. हे सर्व आरोपी पाथरी गावातील रहिवासी असल्याची माहिती आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तलाव बांधकामासाठी आलेले मौल्यवान साहित्य आधीच निशाण्यावर होते. संधी साधून आरोपींनी नियोजनबद्ध पद्धतीने चोरी करून दोन ट्रॅक्टरमध्ये सळई व रॉड भरले आणि अंधाराचा फायदा घेत पसार झाले. या चोरीमुळे तब्बल 15 ते 16 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
घटना उघडकीस आल्यानंतर संबंधित ठेकेदार व विभागाने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास, गोपनीय माहिती आणि गुप्तचर यंत्रणेच्या मदतीने आरोपींचा माग काढला. चौकशीत या टोळीशी संबंधित आणखी काही मोठी नावे पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या प्रकरणामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. सरकारी विकासकामांवर डल्ला मारणाऱ्या अशा टोळ्यांवर कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी जोरदार मागणी होत आहे. दोषींना कठोर शिक्षा झाली नाही, तर भविष्यात अशा घटना आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून चोरी झालेले साहित्य जप्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लवकरच या प्रकरणातील आणखी आरोपी गजाआड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


