बोगस पोलीस आणि पत्रकार बनून खंडणी वसूल करणारे टोळके अटकेत!
गुन्हेगारी पार्श्वभूमीचे टोळकं पोलिसांच्या जाळ्यात; मूल पोलिसांची धडक कारवाई
चंद्रपुर/महाराष्ट्र
रिपोर्टर:- रमाकांत यादव (रिड पब्लिक न्यूज़ भारत)
दिनांक:- १४ जुलाई २०२५
सविस्तर बातमी:-चंद्रपूर जिल्ह्यातील खनिज संपत्तीवर वक्रदृष्टी ठेवणाऱ्या बोगस टोळक्यांवर अखेर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलीस असल्याचे भासवून नागरिकांकडून खंडणी वसूल करणाऱ्या एका फसव्या टोळक्याला मूल पोलिसांनी अटक केली आहे.
हे आरोपी कधी पोलीस भरारी पथक तर कधी पत्रकार असल्याचा बनाव करून सामान्य नागरिकांना धमकावून पैसे उकळत होते. मात्र पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली मूल पोलिसांनी ही चोख कारवाई करून टोळक्याचा पर्दाफाश केला आहे.
खंडणीचा पहिला प्रकार – चिरोलीतील घटना:
३ जुलै रोजी चिरोली गावातील सुरेश लक्ष्मण गनमेनवार यांच्या घरी MH-34-CJ-5824 क्रमांकाची पांढऱ्या रंगाची अर्टिगा गाडी आली. “आम्ही चंद्रपूर पोलीस भरारी पथकाचे अधिकारी आहोत” असे सांगत त्यांच्या घरी अवैध दारू असल्याचे कारण सांगून १५,००० रुपयांची खंडणी मागितली. तडजोडीनंतर १०,००० रुपये देण्यात आले.
दुसरा प्रकार – अंडा आम्लेट टपरीवर धडक:
डोंगरगाव येथील एजाज शेख यांच्या अंडा आम्लेट टपरीवर काही जण दारू पीत असताना हेच टोळके पोलीस असल्याचे भासवत आले. “१०,००० रुपये द्या नाहीतर आत टाकू” अशी धमकी देत ५,००० रुपये वसूल केले.
या प्रकरणी १३ जुलै रोजी मूल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
अटक आरोपी व जप्त मालमत्ता:
या प्रकरणात मूल पोलिसांनी पुढील आरोपींना अटक केली आहे। बादल दुर्गाप्रसाद दुबे (वय ३६),संगीता बादल दुबे (वय २७) – पती-पत्नी,अजय विजय उईके (वय ३१),देवेंद्र चरणदास सोनवणे (वय ३०)
जप्त मुद्देमाल ३ मोबाईल, एक चारचाकी वाहन, एकूण किंमत: ₹१३,१०,०००/-
बोगस पत्रकार आणि पोलीस बनून कसा करत होते खंडणीचा खेळ?
या टोळक्याची युक्ती होती – भाड्याने गाडी घेऊन, दोन-तीन साथीदार सोबत, त्यांना पोलीस किंवा पत्रकाराचे बनावट ओळखपत्र देऊन वाळू घाट, सट्टा, किंवा दारू विक्रेत्यांकडे जाऊन कायद्याचा धाक दाखवत पैसे उकळायचे.
बादल दुबे व संगीता दुबे या पती-पत्नीचा यापूर्वीही भंडाऱ्यात रेती व्यावसायिकांकडून खंडणी मागतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.
तेव्हाही त्यांनी स्वतःला पत्रकार म्हणून ओळख दिली होती.
प्रामाणिक पत्रकारांना लागलेली गालबोट:
चंद्रपूरात सध्या अनेक अशिक्षित, अपारंपरिक व्यक्ती पत्रकार असल्याचा दावा करत पत्रकारितेचा गैरवापर करत आहेत. हे लोक न कायदे जाणतात, न पत्रकारितेची नीतीमूल्यं.
त्यांचा उद्देश फक्त ‘पत्रकार’ सांगून धमकी व खंडणी वसूल करणे हा आहे.
पोलीस विभागाचे आवाहन:
बोगस पोलीस किंवा पत्रकारांपासून सावध राहा!
कोणतीही धमकी मिळाल्यास तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधा किंवा ११२ नियंत्रण कक्षावर कॉल करा.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव, पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या नेतृत्वात
सुबोध वंजारी व सहकारी पोलीस कर्मचारी – जमीर खान पठाण, भोजराज मुंडरे, चिमाजी देवकते, नरेश कोडापे, शंकर बोरसरे व संदीप चौधरी यांनी कार्यवाही केली।


