Thursday, September 17, 2026
HomeBreaking newsसिंदेवाही तालुक्यातील चारगाव येथे पुलिया बांधकामाचा घोटाळा उघड, निकृष्ट कामामुळे जीव धोक्यात

सिंदेवाही तालुक्यातील चारगाव येथे पुलिया बांधकामाचा घोटाळा उघड, निकृष्ट कामामुळे जीव धोक्यात

सिंदेवाही तालुक्यातील चारगाव येथे पुलिया बांधकामाचा घोटाळा उघड, निकृष्ट कामामुळे जीव धोक्यात

चंद्रपूर महाराष्ट्र

रिपोर्टर: रमाकांत यादव | रिड पब्लिक न्यूज भारत

दिनांक: ०९ जानेवारी २०२६

सविस्तर बातमी: सिंदेवाही तालुक्यातील ग्रामपंचायत चारगाव परिसरात सुरू असलेले पुलिया बांधकाम हे विकासाचे नव्हे, तर थेट भ्रष्टाचाराचे जिवंत उदाहरण बनले आहे. या पुलियाच्या बांधकामात दर्जा, नियम आणि सुरक्षिततेला पूर्णपणे तिलांजली दिली जात असून ग्रामस्थांच्या जीवाशी सरळसरळ खेळ सुरू असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार पुलियाचे बांधकाम इतक्या निकृष्ट पद्धतीने सुरू आहे की ही पुलिया पूर्ण होण्याआधीच कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वापरण्यात येणारे साहित्य हलक्या दर्जाचे असून कोणतेही तांत्रिक मोजमाप किंवा मानक पाळले जात नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
हे संपूर्ण बांधकाम महार्शी कंपनीकडून करण्यात येत असून, कंपनीकडून केवळ कागदोपत्री काम दाखवून प्रत्यक्षात निकृष्ट काम सुरू असल्याचा आरोप होत आहे. विशेष म्हणजे या कामावर राबणाऱ्या मजुरांना वेळेवर वेतन दिले जात नसल्याने मजूर वर्गही त्रस्त आहे. मजुरांचे पैसे अडवले जात असतील, तर निधी नेमका कुठे जात आहे, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
या कामाची पाहणी करण्यासाठी जेव्हा सामाजिक कार्यकर्ते किंवा पत्रकार घटनास्थळी पोहोचतात, तेव्हा आश्चर्यकारकरित्या कोणताही जबाबदार अधिकारी, अभियंता किंवा कंपनीचा प्रतिनिधी उपस्थित राहत नाही. प्रश्न विचारल्यास थंड, टाळाटाळ करणारी उत्तरे देऊन विषय झाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप आहे.
या संपूर्ण प्रकरणात ग्रामपंचायत चारगावच्या सरपंच अस्मिता कवटे आणि ग्रामसेवक राजू लोणारे यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. गावात एवढ्या गंभीर स्वरूपाचे काम सुरू असताना लोकप्रतिनिधी आणि प्रशासन डोळे झाकून बसले आहेत का, असा थेट सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.
नागरिकांनी प्रशासनाकडे स्पष्ट मागणी केली आहे की या पुलिया बांधकामाची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, कामाची तांत्रिक गुणवत्ता तपासावी, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि मजुरांचे थकीत वेतन त्वरित अदा करावे. अन्यथा भविष्यात एखादा मोठा अपघात झाल्यास त्याची जबाबदारी नेमकी कोण घेणार, हा प्रश्न अनुत्तरित राहणार आहे.

संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular