Tuesday, April 21, 2026
HomeBreaking newsविशेष लेख : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने

विशेष लेख : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने

विशेष लेख : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने

रिपोर्टर:- नरसिंग बोल्लम रीड पब्लिक न्यूज भारत मिडिया नेटवर्क

पोरसवदा मराठी तू !

चंद्रपूर : माय मराठीचा गोडवा संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या ज्ञानेश्वरीत सांगितलेला आहे. ते मोठेपण आजही प्रत्येकाच्या जिभेवर रेंगाळतो आहे.

माझा मराठाचि बोलुन कौतुके…परी अमृतातेही पैंजा जिंके !…..

अशी अमृतवाणी ज्ञानदेवांच्या शब्दाशब्दातून व्यक्त झाली. आज मराठी भाषेचं महत्व कमी करण्याचा डाव रचला जात आहे. मराठी भाषेची तुलना हिंदी इंग्रजिशी होऊ लागलेली आहे. टिकाकारांना वाटतं, मराठी भाषा अजून वयात आलेली नाही. ती पोरसवदा आहे. तिच्यात पोक्तपणा आले नाही, ती अल्लड आहे. या अशा विचारांनी मराठी भाषेला राज्यासनावरून दूर करून लोखंडी साखळी करकच्चून बांधणाऱ्यांना सांगू इच्छिते, हो ! आहे पोरसवदा मराठी

पोरसवदा मराठी तू !

अल्लड लाजरी बावरी

कधी हसरी कधी दुखरी

कधी कडक कधी बेधडक

सुकून गेली जरी तू !

येशील बहरून पुन्हा

ज्ञानबा तुकोबाच्या अभंगाने

मिळेल संजिवनी तुजला पुन्हा

तुझे अस्तित्व मिटवाया

धाकुनि आल्या अनेक भाषा

मराठी भाषेत आहे गोडवा

असेल जगी जरी लाखो भाषा…..

होय! खरच ती अल्लड, खळखळून हसवणारी, लाजवणारी, रडवणारी, दुख मुक्त करायला आपुलकीचे चार शब्द देणारी, कधी तापट, परखडपणे आपले विचार व्यक्त करणारी, रोखठोकपणे आपल्या अभंगातून विचार व्यक्त करणारे वारकरी मंदिराचा कळस म्हणजे संत तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही विष्णुदास मेणापेक्षाही मऊ…प्रसंगी इंद्राच्या वज्राला भेदुनी जाऊ….

म्हणून मराठी भाषेला राजभाषेचा, अभिजात दर्जा नाकारणाऱ्यांना सांगू इच्छिते, हो ! खरचं आहे. अजून मराठी पोरसवदा चागल्यांशी इतकं चांगल वागु की, लंगोटी काढून देऊ, भले तरी देऊ, कासेची लंगोटी. वाईटाशी मात्र नाठाळाचे माथी हाणू काठी. अरे ! 11 कोटी लोकांची मायबोली असणारी मराठी ही भारतातील चौथ्या क्रमांकांची असली तरी, सर्वाधिक बोलल्या जाते. प्रमाण भाषेबरोबरच बोलीभाषेचा मोठा गोतावळा तिला लाभला आहे. मराठी भाषेएवढाच मराठी साहित्याचा इतिहास मोठा आहे. पण हा इतिहास खोडून काढण्याच्या प्रयत्न काही कावळे करीत आहे. ज्या कावळयांना स्वत:च अस्तित्व नाही. घर नाही. त्यांना मराठी भाषेच महत्व काय कळेल. मराठी भाषा शिकविते प्रेम करायचं, ते वासनेने बरबटलेलं नाही, तर भावभावनांनी सजलेले.

विंदा करंदीकरांनी काय सुंदर भावना आपल्या प्रेम कवितेत मांडल्या….

असे बोलावे तुझ्याशी,

ठरवून आलो मनात काही

आणिक तुझिया नेत्री दिसले

बोलायचे तसे तुलाही…

आज सुशिक्षित तरुण परकीय भाषेकडे आकर्षित झालेले आहे. त्यांना मराठी भाषेची लाज वाटायला लागली. नको तिथे परकीय भाषेचा वापर करतात. साधा ऑटो थांबवायचा असेल तरी, भैया रुको. वास्तवत: दादा थांबा, या शब्दात किती आपुलकी आहे. हल्ली इंग्रजी माध्यमाच्या शाळांना महत्व आलेले आहे. परंतु जागतिक शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री. रणजित सिंह डिसले गुरुजी जिल्हा परिषदेच्या शाळेचा दर्जा सुधारतोय हे आश्वासक उदाहरण नाही का?

आज मुलांना कुठलीच भाषा बरोबर येत नाही. मराठी, हिंदी, इंग्रजी सर्व भाषा एकत्र करून त्याची खिचडी केली जाते. म्हणतात ना, जिथं पिकते तिथं विकत नाही. जी गोष्ट आपल्या जवळ आहे, तिची किंमत नसते. परंतु परदेशी गेलेल्या तरुणांना विचारा, एखादा मराठी भाषिक भेटल्यावर त्यांना किती अत्यानंद होतो. हे भाषेचे अदृश्यधागे आहेत. भाषा टिकवायची असेल तर आपल्याला तिला ज्ञानभाषा बनवावी लागेल. ज्ञानभाषा म्हणजे ज्ञानार्जनाची, ज्ञान संवर्धनाची व ज्ञान देण्याची भाषा. खरे तर या दिशेने मराठी मंडळाचे प्रयत्न सुरू झाले आहे. भाषेचा विकास विविध क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण वापरातून होत असतो. म्हणून आपण सर्व क्षेत्रात मराठी भाषेचाच वापर कसा करता येईल, यासाठी प्रयत्न केला पाहिजे.

मराठी भाषा टिकली तरच समाज टिकेल आणि येणारी पुढची पिढीसुद्धा. लोकांना वाटतं इंग्रजी भाषेमुळेच नोकरी मिळू शकते किंवा आपल्या आयुष्याला तारणारी भाषा इंग्रजीच आहे. परंतु अशी अनेक उदा. आपल्याला देता येतील. मराठी भाषेत किती साधारण व्यक्तींना मोठं केलं आहे. मनस्वी अभियानातून मराठी भाषेला जाज्वल्य प्राप्त करुन देण्याकरीता किमान एखादी तरी कृती नाही का फुलवू शकणार? आपली मराठी भाषा समृद्ध व्हावी, तिचा प्रचार प्रसार व्हावा, यासाठी शाळेमधून सुरुवात करता येईल. डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलामांची सांगितलेलं होत, “बालक” हाच शास्त्रज्ञ. कारण त्याच्यामध्ये जिज्ञासुवृत्ती मोठ्या प्रमाणात असते. बालकांना शिक्षकांनी लिहिण्यास प्रोत्साहित केल्यास छान-छान, बड-बड गीते तयार होतील. कथा, कविता, चारोळया, लेख, नाटक, पोवाडे, भारुड, या लेखनातून मराठी साहित्यात भर पडेल. सर्व लिहिले व वाचले होईल. असा छोटासा प्रयत्न माझ्या माय माऊलीला हिरवगार, रंगीबेरंगी पोरसवदे प्रमाणे बहरून टाकेल.

मया मराठी भाषेचा,

काय सांगू थाट

तिने केली सर्व

भाषेवर मात !

प्रेमावर आहे सर्व जग

असे सांगुनि गेले संत

नात-भेद मद मत्सराने

होई तुमची गत !

बोलता मराठी शब्द

लागेल दुसऱ्याला कळा

तेव्हा बोला मराठीत

पोरांनो घळाघळा !

शुभांगी उत्तमराव मोहितकर
प्रा. एफ.ई.एस. ज्युनिअर गर्ल्स कॉलेज, चंद्रपूर.

 

संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular