चंद्रपूर–कोलकाता रेल्वेगाडी सुरू करण्याची मागणी
रिपोर्टर:- नरसिंग बोल्लम रीड पब्लिक न्यूज भारत मिडिया नेटवर्क
चंद्रपूर येथून कोलकाता रेल्वेगाडी सुरू करण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. यासंदर्भात चंद्रपूरचे आमदार किशोर भाऊ जोरगेवर यांनीही आपला पाठिंबा दर्शवला असून, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांच्याकडे या मागणीचा पुनरुच्चार केला आहे.
काल चंद्रपूर रेल्वे स्थानकावर बंगाली समाजाच्या वतीने काजीपेट–हावडा रेल्वेगाडी सुरू करण्यासाठी आंदोलन करण्यात आले. चंद्रपूरकर अनेक वर्षांपासून चंदाफोर्ट ते हावडा रेल्वेसेवेची मागणी करत आहेत. चंद्रपूर रेल्वे स्थानकावरून सुमारे १६ ते १७ राज्यांसाठी रेल्वेसेवा उपलब्ध आहे, मात्र पश्चिम बंगालसाठी अद्याप कोणतीही थेट सेवा उपलब्ध नाही, ही खेदाची बाब आहे.
चंद्रपूर, गडचिरोली आणि कागजनगर येथील लाखो मतुआ समाज बांधव दरवर्षी ठाकुरनगर येथे हरिचंद्र ठाकूर यांच्या तीर्थस्थळी दर्शनासाठी जातात. तसेच, गंगासागर, बेलूर मठ, कालीबाडी, दक्षिणेश्वर मंदिर, शांतीनिकेतन, दार्जिलिंग यांसारख्या पर्यटनस्थळांना जाणारे प्रवासीही मोठ्या संख्येने आहेत. मात्र, पश्चिम बंगालपर्यंत थेट रेल्वेसेवा नसल्याने त्यांना नागपूरमार्गे प्रदीर्घ प्रवास करावा लागतो.
पर्यटनासोबतच व्यापारी व विद्यार्थी यांच्यासाठीही ही रेल्वेसेवा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. एवढे वर्षांनंतरही बंगाली समाजाला आपल्या हक्काची रेल्वेसेवा मिळाली नाही, हे दुर्दैवी आहे.
मागण्यांचा पुनरुच्चार
बंगाली समाज जन अधिकार संघर्ष समितीच्या वतीने मागील चार वर्षांपासून या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते डॉ. सत्यजीत पोद्दार, मीडिया संयोजक गोविंद मित्र, कृष्ण गायन, तापस मंडल, विवेक मंडल, वासुदेव मल्लिक आणि गडचिरोली जिल्ह्यातील दलपति साधू गोसाई व युवा कार्यकर्त्यांचे आंदोलन सुरू आहे.
समाजाच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत:
1. नांदेड–सांतरागाछी (12767) रेल्वेगाडीला माजरीमार्गे वळवून बल्लारशाह वाया चंदाफोर्ट ते सांतरागाछी सुरू करावी.
2. मद्रास–बिलासपूर (12852) या रेल्वेगाडीचा विस्तार बिलासपूर ते हावडा असा करावा.
या मागण्यांबाबत केंद्र सरकारने त्वरित निर्णय घ्यावा, अशी विनंती सामाजिक संघटनांकडून करण्यात आली आहे.


